Skip to main content

Posts

तु

 तुझ्या आठवांनी झोप चोरली, ही रात्र का संपत नाही, मी मनात बोलतो तुझ्याशी, पण तुझं उत्तर का येत नाही. तुझी चाहूल लागते, आणि हवा गोंजारते काही, मी डोळे मिटतो सावकाश, पण स्वप्नात तू दिसतच नाही. तुझं नाव लिहायचं, हात थरथरतो का कुणास ठाऊक, मी आकाशात शोधतो तुला, पण तारा सुद्धा ओळखत नाही. तुझ्या सुगंधात हरवायचं, हे मन रोज ठरवतं, पण दरवेळी त्या वाऱ्याला तुझं ठिकाण सापडतच नाही. तुझं नाव लिहिलं तरी, शब्द का जळत जातात, मी मनात ओतलं पाणी, ते डोळ्यातून का वाहतं. हे असं चालूच राहिलं तर, शब्दही दमून जातील, पण मी तुझीच वाट पाहत कविताच होत जाईन.
Recent posts

विरह

 तुला पाहिलं अन् विरहाचं कारण कळेना,  स्वतःच्या श्वासाचं वजन कळेना. तुझं नाव घेताना शब्द थबकतो ओठांवर, अन् का कोण जाणे, त्या गोड गूढाचं स्पष्टीकरण कळेना. तू दूर आहेस, हे सत्य मला झोपवत नाही, स्वप्नात येशील, असं म्हणावं की नको,याचं उत्तर कळेना. प्रेम असावं तर असं, झुळूक असावी जशी, सुगंध वाटावा पण स्पर्शाचंही स्पष्टीकरण कळेना. सांभाळावं हळूच, असं नातं आहे आपलं, जे मोडेल शब्दांनं, पण मौनानं त्याचं पतन कळेना.

मोकळा श्वास

  थोडा हवा आहे.मोकळा श्वास, जिथं ओझं नाही, जिथं गर्दीचा भास नाही, फुफ्फुस भरून घेताना, मनही भरून यावं, आणि एकदाच सही, हलकं वाटावं! इथं श्वास घेतले जातात, पण आत कुठेतरी अडखळतात, तुझ्यासमोर येऊनही शब्द रेंगाळतात, मग हा श्वास कसा मोकळा व्हायचा? एखादी संध्याकाळ अशी हवी, जिथं वाऱ्याने हळूच केस विस्कटावेत, डोळ्यांतली धूळ निघून जावी, आणि पापण्यांवर शांत निवांतपणा ठेवावा!

सखे साजणी

  सखे साजणी, तू सवय झाली, उगाच मनास भुलवू नको, गेल्या गगनी या सावल्या जरी, पावसास वेडावू नको.. तुझ्या सहवासी मंद वारे, पारिजातही फुलला गडे, स्मरते मजला बोल तुझे ते, पायवाटही खुलली गडे! सांज सभोती झुळूक हलकी, तुझीच चाहूल लागली जशी, स्वप्नांमध्येही तूच यावी, सावली झालीस जशी! मज दूर जाऊ नकोस गं आता, सोसत नाही विरहाचे वारे, सखे साजणी, तू सवय झाली, राहशील ना तू माझ्याच द्वारे?

राहू दे

  राहू दे ना काही गोष्टी तशाच, उगाच उकरून कशाला बघायचं? कधी काही ओळी अपुऱ्या असतात, त्या पूर्ण करायला कशाला धडपडायचं? राहू दे काही प्रश्न हवेत विरून, उत्तरांमधून काही बदलत नसतं, कधी कधी शांततेलाच आवाज असतो, शब्दांचं ओझं माणसाला पेलत नसतं. राहू दे काही आठवणी धुसर, पुन्हा रंग भरायला वेळच कुठे? काही जखमा असतात ताज्याच छान, ओठांवर आणलं तर फिक्याच पडतं. राहू दे. बोलायचं नाही ना काही? फक्त बसायचं शांत, मोगऱ्याच्या गंधात, काही विरलं, काही टिकून राहिलं, बाकीचं सगळं, उगाच शब्दांवर टाकू नकोस हात.

शांतीचा शून्यबिंदू

         अंतर्मनाच्या ओलसर पायवाटेवरून..      मी त्या असीम शांतीच्या शोधात आहे. अशी शांती, जिला शब्द नाहीत, रूप नाही, ओळख नाही. जिथे मनाचं नितळपणही गहिरं वाटू लागतं आणि भावना सुद्धा एका अपरिचित उंबरठ्यावरच थबकतात. माझ्या आत जे चाललंय, ते या बाह्य जगाशी काहीच साम्य ठेवत नाही. मन म्हणतं, "थांब", पण आत्मा मात्र चालत राहतो. कारण ही चाल "कुठे जाण्याची" नाही. ही चाल आहे, स्वतःपासून दूर जाण्याची.      सततच्या आशा, अपेक्षा, भावनिक ओढी यामध्ये आपण शांतीचा उल्लेख करतो. पण खरंच, ती या सगळ्यांमध्येच आहे का? की या सगळ्यांपासून "मुक्त" झाल्यावर? जसं झाडावर पानं असतात, पण खऱ्या शांततेसाठी झाडावर काहीही नसलं तरी चालतं, तशीच ही अवस्था. ही शांती म्हणजे नकार नाही, हे काही टाळणं नाही; ही एक अंतःस्वरूपातील निर्मोही ओळख आहे,स्वतःच्याही पलीकडची. भगवद्गीतेतील एक श्लोक इथे काळजात खोल जाऊन भिडतो.. "आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्। तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी॥" (गीता – अध्याय २, श्लोक ७०) अर्थ असा — जसा समुद्र ...

तू पारिजात..भाग ३

तू पारिजात..  श्री कृष्णाच्या अंगणात उमलणारी, रुक्मिणीच्या  संसारात हरवणारी, सत्यभामेच्या अहंकारात जळणारी, आणि तरीही, फक्त त्याच्यासाठीच फुलणारी... मी? मी कदाचित कृष्णाचा रथ असावा, तुला उचलून न्यायला धावणारा, की मीच ती बाग, जिथं तू उगवायचीस, आणि मी फक्त वाट पाहायचो— तू केव्हा पडशील आणि मी तुला उचलून धरिन… तू सुगंधाचा श्वास, आणि मी तो वारा, तू अलगद मिटणारी पापडी, आणि मी तुला हलवणारा स्पर्श... पण अखेरचं सत्य काय माहितेय का? तू जेव्हा पहाटे गळून पडतेस, तेव्हा तुझा गंध तरी कुणासाठी उरत असतो? मी उचलायच्या आतच, तू मातीत मिसळून गेलेली असतेस…!